यशवंतांच्या नंतर मराठीतील आई कुठे गेली?असा प्रश्न कुसुमाग्रजाना पडला.मलाही वाटू लागते की कुठे जाते ही आई काही काही वेळा?सांगली महापालिकेने नुकताच झोपड़पट्टी हटाव कार्यक्रम घाव घालत राबवला.झोपड्या उडवून लावल्या. सामान रस्त्यावर फेकले.झोपडी उध्वस्त!संतप्त! शिव्या,दगडफेक हे समजता येते.पण एका मातेने काय करावे?तिनेआपले दोन वर्षांचे मूल कडेवरून उचलले आणि दाणदिशी दगडावर आपटले.मुलाने डोळे फिरवले .बेशुद्ध झाले.रक्ताने भिजले.सुरक्षा दलातल्या दोन तरुण स्त्रिया पुढे आल्या मुलाला उचलले.औषधपाणी केले.त्या पोलिस बाईनी तान्ह्याला उचलले.सख्ख्या आईने आपटले.मुलाची ती आई तेव्हा कुठे गेली असेल हो?प्रश्न आपण जिवंत राहण्याचा असेल तर माणसाना कठोर व्हावे लागते हे मला ठावूक आहे. कित्येक वन्य जमाती अन्नाला महाग झाल्या,वैराण वाळवंटी वा बर्फमय प्रदेशातून कित्येक महिने हाय हाय करीत जावे लागणार म्हटले की म्हातारी माणसे बिनदिक्कत मारून टाकावी लागतात ,हे मी वाचलेआहे.पण आजच पेपरात मी वाचले की आईचे बापाशी नाते तुटले आणि कुठे तरी नवीन जमले.आई मग उठली.मोका साधला.आठ वर्षांच्या आपल्याच मुलीचे नाक आणि तोंड दाबून धरले.भल्या पहाटेच्या अंधारात ती आई लेकीचे प्रेत कुठेतरी फेकायला निघाली.लोकांना दिसली आणि फसली.
सानेगुरूजी या आईला काय म्हणणार?त्याना कधी ही आई दिसलीच नव्हती.माकडीण नाकातोंडात पाणी जाऊ लागले की पिल्लाला आपल्या पायाखाली घेते. ही माणसाने लिहिलेली कथा आहे.पण परवाच डिस्कव्हरी वाहिनीवर पाहिले की मरून पडलेल्या आपल्या पिल्लाजवल माकडमाता शोकाने जाते.त्याला नाना प्रकारे तपासते.परिवाराला बोलावते .सर्वजण येतात. पिल्लाची बारीक पाहणी करतात.माता मग ज़रा दूर जाते.डोळे पंजाने पुसत राहते.दुष्काळ पडणार.खायला कमी असणार .लेकरानी जगावे म्हणून वानरी झाडाच्या ढोलीत ,धान्य आणि फळजाती चावून चावून बनवलेले लाडू ठेवते आणि मग नरमादी दोघेही लाकडाच्या खोडावर प्राण सोडतात.मारुती चितमपल्ली यानीच हे लिहिलय!माणसाची मादी मग काही वेळा आपल्याच पिलांचा प्राण का घेते?तिचे स्तन्य पार आटून का जाते?
No comments:
Post a Comment