दृष्टमाळ ! परंपराचे अंधानुकरण कि दुर्लक्षित प्रथमोपचार पेटी !
दृष्टमाळ म्हटले कि पटकन नजरेसमोर येतात ती सिग्नल जवळ लिंबू , मिरची आणि बिब्बा एका तारेत गुंफून विकायला येणारी मुले. आणि सिग्नल पडायच्या आत जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची केविलवाणी धडपड.! पण हि दृष्टमाळ नेमकी कशासाठी ? याचा शोध घेता घेता एक विलक्षण माहिती हातात सापडली.! खरतर हि दृष्टमाळ न्हवेच! हि आहे आपल्या पूर्वजांची प्रथमोपचार पेटी.! यातले जिन्नस पहा. पहिली मिरची दुसरे लिंबू तिसरा बिब्बा. आता याचा उपयोग जाणून घेऊया.
आपल्या शेतीप्रधान संस्कृतीत जास्तीत जास्त लोक खेड्यात राहत. उपजीविकेसाठी शेती करीत. शेती करताना अनेकदा सर्पदंश सारखे प्रकार सर्रास व्हायचे. आणि अनेक जन यात मृत्यमुखी पडायचे. विषारी सर्पाचा दंश झाला तर प्रथम माणसाच्या चव ओळखण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे विषारी सर्प चावला कि बिनविषारी हे समजण्यासाठी अश्या सर्पदंश झालेल्या माणसाला मिरची चावायला दिली जाई. ती तिखट लागली तर जीवास धोका नाही पण त्याची चव ओळखता आली नाही तर मग बाका प्रसंग! तर हा दृष्ट माळेतला पहिला जिन्नस आणि त्याचा उपयोग.
आता यातील दुसरी वस्तू म्हणजे लिंबू . पावसाआधी शेत नांगरणीसाठी तयार व्हावे यासाठी ग्रीष्मात शेतकऱ्यास बरीच अंगमेहनत करावी लागते. जमीन नीट करणे , सरपणासाठी लागणारा लाकूड फाटा फोडून घरात रचून ठेवणे, पावसाळ्यापूर्वी घराचे छप्पर नीट लावून घेणे वगैरे वगैरे. हि सर्व कामे वेळेत उरकायची म्हणजे उन्हाची तमा न बाळगता काम करावे लागे. अशा उन्हात सतत काम केल्यामुळे नाकाचा घोणा फुटून रक्त येवू लागले कि औषधी वनस्पतीबरोबर लिंबाचे पाणी देऊन पोटातील उष्णता कमी करण्यासाठी या लिंबाचा उपयोग होत असे.
आता तिसरी आणि शेवटची वस्तू म्हणजे बिब्बा. बिब्बा हि एक दुर्लक्षीत औषधी वनस्पती आहे. पोटात दुखत असेल तर दह्यात बिब्ब्याचे तेल एक ते दोन थेंब टाकून प्यायले तर पोटदुखी तत्काळ थांबते. अंगदुखी वर तिळाच्या तेलात बिब्ब्याच्या तेलाचे थोडे थेंब टाकले आणि मालिश केल्यास उपयोग होतो. पायात काटा रुतल्यास काटा काढून झाल्यावर त्याने बाधा होऊ नये म्हणून बिब्बा गरम करून त्या जागेवर चटका देतात. आजीबाईच्या बटव्यात हि बिब्बा आपले स्थान राखून आहे.
अश्या या तीन वारंवार लागणाऱ्या बहुगुणी वस्तूंना एकत्र बांधून पटकन मिळायला हवी म्हणून दारात बांधून ठेवण्याची पद्धत रूढ झाली असावी. त्यामुळे घर चालू असो व बंद हि दृष्टमाळ दारात मिळणारच. कुठल्याही घरात गेलो तरी जागा एकच. त्यामुळे शोधाशोध करावी लागू नये यासाठी घेतलेली दक्षता दिसते. अमावास्या पौर्णिमेला बदलण्याचे कारण लिंबू आणि मिरची ताजी असावी यासाठी. आहे कि नाही कमाल. पण हीच प्रथमोपचार पेटी आता दृष्टमाळ झाली. आणि अंधश्रद्धा म्हणून सरसकट सगळ्याच परंपरांना झोडपून काढणाऱ्यांच्या हिटलिस्ट वर सर्वात वरचे स्थान मिळवून बसली.
No comments:
Post a Comment